खरेदीदारांकडून मागवले प्रस्ताव
नवी दिल्ली : बुडित निघालेली सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनीची मोदी सरकारकडून विक्री करण्यात येणार आहे. एअर इंडियातील संपूर्ण भागीदारी सरकार विकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच लवकरच याचा लिलाव होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. सरकारने कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले असून, खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी 17 मार्च 2020 अखेरीची तारीख निश्चित केली आहे. याचबरोबर सरकारने एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षापासून कर्जामुळे डबघाईला आलेल्या सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एअर इंडियाचे शंभर टक्के भाग सरकार विकणार असून, त्याचबरोबर एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी या दोन कंपन्यांमधील 50 टक्के भागही सरकारने विक्रीस काढले आहेत. निर्गुणवणुकीच्या धोरणाचा भाग म्हणून सरकारने एअर इंडियाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एअरपोर्ट सर्व्हिस कंपनीत एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्सचे समान समभाग आहेत. एअर इंडियाच्या विक्रीसंदर्भात मंत्रिमंडळाने अलिकडेच प्रस्तावाला मंजुरी दिली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
सरकारने एअर इंडियातील शंभर टक्के समभाग विक्रीस काढले आहेत. गेल्या वर्षी सरकारने 76 टक्के समभाग विक्रीसाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र, सरकारला एकही खरेदीदार मिळाला नाही. लिलाव प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर त्यावर एक अहवाल मागवण्यात आला होता. त्या अहवालानुसार अटींमध्ये बदल करण्यात आले.