पिंपरी – आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होणे निश्चित असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. केवळ साक्षरपेक्षा एआय साक्षर होणे आवश्यक असून शिक्षण, आरोग्य, सेवा क्षेत्रात एआय महत्वाची भूमिका निभावणार आहे. मात्र मानवी बुद्धी कोणत्याही एआयपेक्षा अधिक तरल आहे. एआयकडे सहानुभूती प्रेमभाव नाही. माणसाकडे या दोन्हींची जाण आहे. याच भावनेतून आपण समाज आणि देशाची सेवा करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या 14 व्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिज लिमिडेटचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि क्वालिटी श्युरन्स ऍण्ड एक्सलन्स सेल, रामय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बंगळुरूचे प्रमुख सल्लागार डॉ. पी. एन. राजदान यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स (डि. लिट) ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील आदीसह देशभरातून विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक या वेळी उपस्थित होते.
राज्यपाल बैस म्हणाले की, येत्या 2030 पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून 40 ते 80 कोटी रोजगार निर्माण होईल असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यामधल्या 37.5 कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णतः बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. विद्यापीठांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेत एआय आणि मशिन लर्निंगचा समावेश करण्यावर चिंतन केले पाहिजे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत विद्यापीठ तडजोड करत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात ए प्लस-प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.
या वेळी अरूण फिरोदीया, प्रमोद चौधरी, डॉ. पी. एन. राजदान यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या विविध विद्या शाखांमधील परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेतील 4 हजार 95 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएचडी), 3 हजार 15 पदव्युत्तर पदवी, 1 हजार 55 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.