पारनेर – तालुक्यातील कान्हूर पठार येथील सार्वजनिक पेशवेकालीन बारव गावातील काही समाजकंटकांनी रात्रीचा आधार घेत व निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात बुजविल्याने गावातील इतिहासप्रेमी व नागरिक संतप्त झाले आहेत. कान्हूर पठार येथील सार्वजनिक बारवेतील पाण्याचा गेली अनेक दशके ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापर होत होता. या बारवेचे खरेदीखत चुकीच्या पद्धतीने करून ही जागा नावावर केली गेली.
परंतु शासनदरबारी व ग्रामपंचायत दफ्तरी या बारवेची नोंद ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा अधिकार कायम आहे, असा उल्लेख आजही कायम आहे. बारव पाडून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून सुरू होता. परंतु गावातील सुजाण नागरिकांचा विरोध गेली २० वर्षे होता. परंतु कान्हूर पठार ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात आचारसंहिता असताना रात्रीच्या सुमारास ही बारव बुजविण्यात आल्याने ही बारव उकरण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. ही बारव ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता पाडल्यानंतर अमोल ठुबे यांनी तहसीलदार, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल करत पाठपुरावा केला होता.
ठुबे यांच्या लेखी तक्रारीनंतर व आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची शासनदरबारी चौकशी चालू असून, बारव बुजविल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.