कोपरगाव -लाखाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. त्याच्या शेतीच्या हक्काच्या पाण्यासाठी आणि तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची उपलब्धता निर्माण होण्यासाठी पथ, झेंडे, आपसांतील मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षियांनी नगर-नाशिकची एकजूट दाखवावी. गोदावरी खोऱ्यासाठी अन्यायकारी असणारा समन्यायी पाणीवाटपाचा कायदा रद्द करावा, असे प्रतिपादन भाजपच्या नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी गोदावरी खोरे पाणी कृती समितीतर्फे एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करण्यात आले. त्याचे निवेदन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या झेंड्याचे या वेळी अनावरण करण्यात आले.
प्रारंभी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी लाक्षणिक उपोषणाची भूमिका समजावली. संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदीप नवले यांनी प्रास्ताविकात कोल्हे कुटुंबीयांनी पाणी संघर्ष व जलसमृद्धीसाठी काय कामे केली याची माहिती दिली. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून लाक्षणिक उपोषणास सुरुवात करण्यात आली. बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोस, माजी सभापती सुनील देवकर, उत्तमराव चरमळ यांनी जोरदार घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता.
कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी निर्माण करण्यासाठी पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात घेण्यासाठी सातत्याने स्वतःच्या सरकारविरुद्ध सहकाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर उतरत संघर्ष करत थेट मंत्रालयावर धडक मारत सातत्याने लढा दिला आणि 2000मध्ये विधिमंडळात त्यास मंजुरी मिळविली. हा संघर्ष कदापिही विसरून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी गोदावरी खोरे पाणी कृती समितीच्या भावना आणि निवेदनाच्या मागण्या शासनापर्यंत कळवून गोदावरी कालवे नूतनीकरणाच्या कामाला वेग देऊ, असे त्या म्हणाल्या. या वेळी बाळासाहेब वक्ते, दीपक चौधरी, अनिल सोनवणे, सुनील देवकर, राजेंद्र देवकर, यादवराव संवत्सरकर, कैलास माळी, साहेबराव रोहम आदींची भाषणे झाली. या उपोषणास शहर व तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी, कारखाना पदाधिकारी संजीवनी उद्योगसमूहातील संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते. कॉंग्रेसचे आकाश नागरे, अमित आढाव, शिवसेनेचे कैलास जाधव, संजय सातभाई, अनिल सोनवणे मनसेचे अनिल गायकवाड, आदींसह संघटनांनी उपोषणास पाठिंबा दिला.
आमदार झोपेचे सोंग घेऊ नका ः कोल्हे
जायकवाडीच्या पाण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधींची एकजूट आहे, मग आम्ही सातत्याने आवाहन करून येथील आमदार झोपेचे सोंग घेत आहेत काय, सर्वांनी एक व्हा. बळिराजाचा टाहो त्यांनी ऐकावा, आम्हाला पाऊस नाही, पाणी नाही, हक्काचे ब्लॉक नाही, शेती सिंचन व्यवस्थेसाठी अधिकारी नाही तेव्हा चालू हंगामात जेमतेम पाणी आहे ते तरी सोडू नका, कालवे सल्लागार बैठक तत्काळ घेऊन रब्बीचे तीन आणि उन्हाळ दोन असे पाच आर्वतने तत्काळ द्या, असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.
“समृद्धी’प्रमाणे पाणी वळवा ः कोल्हे
ज्याप्रमाणे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग बनविला, त्याच धर्तीवर पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाणी वाद कमी करावा, असे विवेक कोल्हे म्हणताच उपोषणकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला.
==============