जामखेड – जातीय-धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अफवांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स, हिंदू आक्रोश मोर्चा, व्हॉट्सअप स्टेटस अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अलीकडच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढत चाललेल्या आपण पाहिल्या. मात्र, तालुक्यातील पाटोदा येथील माजी सरपंच गफ्फार पठाण याला अपवाद ठरले आहे! दरवर्षी त्यांच्याकडून होणारी आषाढी कार्तिकी वारीतील वारकऱ्यांची सेवा यामुळे खऱ्या अर्थाने हिंदू-मुस्लिम सलोखा पाळला जात आहे ही कौतुकाची बाब आहे.
दरवर्षी भवरवाडी ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी कांताताई (माईसाहेब) सोनटक्के महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघते. पायी दिंडी पाटोदा येथे आल्यावर माजी सरपंच गफ्फार पठाण यांच्याकडून स्वागत करण्यात येते. या वेळी पठाण कुटुंबीयांकडून वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता पाण्याची सोया करण्यात आली होती. या वेळी खडकतचे माजी सरपंच रामदास उदमले, कल्याण कवादे पाटील, संदीप कडू, नवनाथ माने, विष्णू भवर, मनोहर निर्मळ, आसिफ भाई तांबोळी आदी उपस्थित होते.
या वेळी गफ्फार पठाण म्हणाले की, वारकरी म्हणजे कुठल्या एका धर्माची किंवा पंथाचे आहेत असे नाही. वारकऱ्यांमध्ये शेख मोहम्मदसारखे संत होऊन गेले आहेत. सेवा ही श्रेष्ठ आहे. प्रत्येकाच्या अंतरात्म्यात पांडुरंग-अल्लाह आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आम्ही दरवर्षी उत्साहाने तयारीला लागत असतो. यामध्ये आम्हाला आनंद मिळतो, असे त्यांनी सांगितले.