खेड – खेड (ता.कर्जत) मुख्य रस्त्यालगत तसेच गायरान व गावठाण जागेत असलेली अतिक्रमणे, बसस्थानकात आणि बसस्थानकाच्या आवारात असलेल्या टपऱ्या आणि दुकाने हटवण्याच्या मागणीसाठी खेडमधल्या सुमारे ४० जणांनी कर्जतच्या वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयात निवेदने दिली आहेत.विशेष म्हणजे या मोहिमेत गावातील पदाधिकाऱ्यांनीही यात सहभाग घेतला आहे. गेली काही वर्षांपासून खेडच्या अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर असताना पुन्हा एकदा या प्रश्नाला नव्याने कोलीत भेटले आहे. याबाबत आता गावातील अनेकांनी एकत्र येत प्रशासनाला निवेदने दिली आहेत.
खेडच्या मुख्य रस्त्यावर गायरान, गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. यामध्ये बसस्थानकासमोर गुटखा विक्रीची टपरी, मटण-चिकनची दुकाने असून या दुर्गंधीचा महिला-मुलींना त्रास होत असून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही कुचंबणा होत आहे. राज्यमार्गांवरील वळणालगत दुकानांच्या अतिक्रमणांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या अनधिकृत जागांमुळे वारंवार वादविवाद होत आहेत. खेडमध्ये सुरु असलेल्या गुटखा व दारू विक्रीतुन दररोज सात ते आठ लाखांची उलाढाल होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा मुद्दा चव्हाट्यावर आल्याने खेडकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. मागील काळात अतिक्रमणाचा मुद्दा रंगला असताना खेडमधल्या अनेक गोरगरिब, व्यावसायिकांची दुकाने, घरे पडणार की राहणार? या विचाराने अनेकांना धास्ती बसली होती. त्यांनंतर हा विषय शिथिल झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, काही महिन्यांपूर्वी शिवभक्त ग्रुपच्या तरुणांनी एकत्र येत इथल्या मुख्य चौकात भगवा ध्वज उभारला आहे.
या ध्वजामुळे रस्त्याला अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदन प्रभाग क्र.३ मधल्या नागरिकांनी प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने आठवड्यापुर्वी भेट देत पाहणी केली होती. दि.३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाघचौरे व पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांनी पाहणी करून संबंधित दोन्हीही गटाच्या नागरिकांशी चर्चा केली होती. मात्र यावर तोडगा निघाला नाही. उलट त्यांनी इथली अतिक्रमणे काढावीत, असा इशारा दिला होता. त्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न पेटला आहे. मात्र याचा फटका गोरगरीब नागरिक, लहान- मोठे व्यावसायिक बसणार आहे हे मात्र नक्की!
स्थानिक नेते-पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष!
सध्या गावातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांची भक्कम अतिक्रमणे आहेत. यात घरे, व्यावसायिक दुकानांचा समावेश आहे. तरुणांनी एकत्र येत अतिक्रमणाचा प्रश्न हाती घेतला खरा पण या तरुणांना ताकद देण्यासाठी स्थानिक नेते-पदाधिकारी पुढाकार घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.