पिंपरी – अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर निर्माण करून ५०० वर्षांपुर्वीचा कलंक दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. रामराज्य निर्माण करणे हे आपले स्वप्न आहे. सर्व जाती-धर्मातील सर्वसामान्य नागरिकांचे दु:ख समूजन घेणे. ते सोडविणे म्हणजेच रामराज्य होय. सध्या काही जण प्रभू श्रीरामांविषयी काहीही बडबड करत आहेत. राम बहुजनांचे होते. म्हणून ते मांसाहार करत असे चुकीची वक्तव्ये करणाऱ्या वाचाळवीरांना कुठून अक्कल येते, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केला. केवळ प्रसिद्धीसाठी हे वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यांना प्रभू श्रीरामच सदबुद्धी देवो, असा टोलाही आव्हाडांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तीन दिवस अटल महाआरोग्य शिबिरास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, यावेळी बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, माजी आमदार बाळा भेगडे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, माजी खासदार अमर साबळे, अमित गोरखे, विलास मडिगेरी, पदमश्री गिरिश प्रभुणे आदीसह भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्िथत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक वेळेला काही जणांना दुर्धर आजारांना सामोरे जावे लागते. त्याचा खर्च परवडत नाही. त्यासाठी अशी शिबिरे उपयुक्त असतात. सरकारने देखील पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याची सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत निर्माण केली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरात अनेक योजनांची सुरूवात केली. विकासकामे केली. सामान्य लोकांच्या गरजा ओळखणारे ते नेते होते. त्यांच्यासारखा सक्षम नेता आज आपल्यात नाही याचे दु:ख आहे. मात्र आमदार अश्विनी जगताप, शंकर जगताप यांनी त्यांच्या कार्याचा वारसा जोपासला आहे.
या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अटल विनामुल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पुढाकाराने केले जात आहे. त्याचा अनेकांना फायदा झालेला आहे. हा वसा आणि वारसा तसाच ठेऊ. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तुमच्यावर आणि पक्षावर असलेल्या प्रेमामुळेच विधानसभा आणि राज्यसभा निवडणूकीत ते उपस्िथत राहिले. त्यांच्या कामाचा हाच वारसा पुढे घेऊन जाऊ. आमदार उमा खापरे यांनी आभार मानले.