नगर (प्रतिनिधी) –सध्या ऊसाच्या गाळपाचा हंगाम सुरु झाला आहे. आता कारखाने लवकरात लवकर जास्त ऊसतोड करुन घेत आहेत. या सर्व स्पर्धेचा परिणाम येथील स्थानिक ऊस तोड कामगारांवर होत आहे. परिणामी मजुरांना काम न देता मोठे शेतकरी,कारखानदारांनी मशिनच्या साह्याने ऊसाची तोडणी सुरु केली आहे. याचा परिणाम ऊसतोड कामगारांच्या रोजी रोटीवर होताना पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक गावात ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने आहे. त्या यंदा ऊसचे क्षेत्र कमी असल्याने ऊसाची पळवापळव आता सुरू झाली आहे. जिल्ह्यात बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूरांऐवजी यंत्राच्या (मशिन) सहाय्याने ऊसतोडणी करणे जोमाने सुरू झाल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.
हंगामामध्ये सर्व साखर कारखानदारांना जास्त ऊस पटकन घेण्यासाठी धडपड सुरू असते. जो-तो शेतकरी ऊसतोड मशिनकडे डोळे लावून बसलेला दिसत आहे. तर सर्वांनाच ऊस काढण्यासाठी घाई लागलेली असल्यामूळे जो – तो लवकरात लवकर कामे उरकून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. परत शेतीतील इतर कामे करण्यासाठी सर्वजण घाई करतात. पण या घाईघाईमध्ये ऊसतोड मजुरांची संख्या फार कमी झाली आहे.
त्यामुळे मजुरांना ऊस तोडीचे काम मिळत नसल्यामुळे उपासमार होत असल्याचे ऊसतोड मजूर गोवर्धन चव्हाण यांनी बोलताना सांगितले. आणि दोन चार वर्षांत ऊसतोड मजूर हद्दपार होतील, असेही ऊसतोड मजुरांनी या वेळी सांगितले.