कोपरगाव – दिव्यांगांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. दिव्यांगांना समाजाकडून केवळ सहानुभूती नको, तर सहकार्य व सन्मान मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोल्हे यांनी काल (रविवार) तालुक्यातील संवत्सर येथे जाऊन अनंत निकम व भाजपचे दिव्यांग मोर्चाचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे यांचा सत्कार करून त्यांना व सर्व दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, माजी संचालक फकीरराव बोरनारे, रामभाऊ कासार, संजीवनी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाल्या की, अपंगत्वावर मात करत व स्वतःचे दुःख विसरत पुन्हा नव्याने उभारी घेणारे अनेक दिव्यांग बांधव आहेत. जगात कोणतीही गोष्ट असाध्य नाही हे कृतीतून दाखवून देत ते सर्व दिव्यांगांना प्रेरणा देत आहेत. या दिव्यांगांच्या जिद्दीला सलामच केला पाहिजे. दिव्यांगांना अडीअडचणीच्या काळात मदत करण्यासाठी कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योगसमूह नेहमीच अग्रेसर असतो.
सरकारतर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. दिव्यांगांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज असून, अनुकूल वातावरण मिळाल्यास दिव्यांग बांधव उत्कृष्ट कार्य करू शकतात, असेही कोल्हे म्हणाल्या.