महसूलसह पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर; मराठा समाजाकडून आंदोलकांसाठी विविध सुविधा
नगर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले भगवे वादळ आज रविवार (दि.21) रोजी नगर जिल्ह्यातील सिमेवर धडकणार आहे. या भगव्या वादळाच्या सेवा आणि स्वागतासाठी मराठा समाजासह नगरकरही सज्ज झाले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे यांची पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे सायंकाळी सभा होणार आहे. यासाठी दिडशे एकर जमिनीवर स्वच्छता करण्यात आली असून भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रेला अंतरवाली सराटी येथून शनिवारी प्रारंभ झाला. ही पदयात्रा पाथर्डीमार्गे रविवारी सायंकाळी मुक्कामी बाराबाभळी येथे येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान जरांगे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे 25 लाख मराठा बांधव व 3 लाख वाहनांचा ताफा पदयात्रेत सहभागी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे नियोजनही मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे..
या नियोजनासाठी जिल्हाभरातून दिडशे ते दोनशे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. दिडशे एकर जागेवर सध्या 10 जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे सपाटीकरण केले जात आहे. पोलिसही सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलत आहेत. मुक्कामी राहणार्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, जेवणाची व्यवस्थित सोय व्हावी, यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. जवळपास 14 लाख फूड पॅकेट व 15 लाख पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी नियोजित मार्गाची मुंबई पोलिसांनी पाहणी केली असून हे पथक बुधवारी नगरमध्ये आले होते. त्यांनी पदयात्रेच्या मार्गासह मुक्कामाच्या जागेची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा पदयात्रेचे आगमन नगर जिल्ह्यात होत असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. तसेच केलेल्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित प्रशासनाला सूचना केल्या. तसेच कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सांगितले.
पदयात्रा मार्गावर नाष्ट्याची व्यवस्था
नगर शहरातून जाणार्या या पदयात्रामार्गावर अनेक राजकीय, सामाजिक, तसेच व्यापारीवर्गाकडून नाष्टा, व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचे 110 टँकर व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून किमान एक लाख फूड पॅकेट तयार करून ते मुक्कामाच्या ठिकाणी आणले जाणार आहेत.
25 बेडचे फिरते रुग्णालय
पदयात्रेतील मराठा बांधवांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शहरातील डॉक्टर आता पुढे सरसावले आहेत. मेडिकल असोसिएशन देखील यात अग्रेसर असून औषधे पुरविणार आहेत. 25 बेडचे फिरते रुग्णालय या मार्गावर चोवीस तास कार्यरत राहणार आहे.
मुंबई पोलिसांकडूनही मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.