पिंपरी – पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अनुदानाबरोबरच शबरी, माता रमाई घरकुल अशा विविध योजनांचादेखील शहरी भागातील त्या प्रवर्गांना लाभ देण्याचा विषय कॅबिनेटपुढे आहे, असे सांगत तुम्ही सगळे जण आम्हाला आशीर्वाद द्या. मी सगळं तुमच्याकरता करतो तुम्ही काळजीच करू नका, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी व पिंपरीतील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या नावाची सोडत पवार यांच्या हस्ते पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी (दि.20) पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, उपायुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माढा अधिनियम सुधारणा विधेयकास डिसेंबर 2022 मध्ये मंजुरी दिली आहे. या विधेयकानुसार महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या पुनर्विकास करता येणार आहे. त्याचा फायदा आपल्या पिंपरी चिंचवड व पुण्याला पण होणार आहे. ज्या मालकांनी किंवा विकासकांनी पुनर्वसन प्रकल्प अनेक वर्षापासून रखडविले आहेत, त्यांना नोटीस बजावा. त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास ही जागा ताब्यात घेऊन म्हाडा किंवा अन्य विभागाच्या वतीने याठिकाणी प्रकल्प पूर्ण करा, अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिल्या.
ही सोडत संगणकीय पद्धतीने मानवी हस्तक्षेपाशिवाय होत असून, यामध्ये गैरप्रकार करता येणार नाही, हे मी स्पष्ट करतो. तुम्हाला कोणी सांगत असेल की मी या योजनेत तुमचा नंबर लावून देत, तर त्याकडे दुर्लक्ष करा. महापालिकेने कोणताही दलाल नेमलेला नाही. तसे कोणी सांगत असेल, दस का बीस करणार्यांना आता मी सरळ करणार असल्याचा इशारा आपल्या भाषणात दिला.
अन्यथा ब्रम्हदेवही घर देऊ शकणार नाही
बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, एक किंवा दोन अपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खूपचं वाढलेली आहे. लोकसंख्या अशीच वाढत गेली ना मग अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरं बांधून देऊ शकणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी संगणकीय सोडती दरम्यान केले. तसेच दोन्ही प्रकल्पातील संगणकीय सोडतीनंतर लाभार्थ्यांकडून सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांना हक्काचे घर देण्यापासून ताटकळत ठेवू नका. या लाभार्त्यांना तत्काळ घराचा ताबा द्या, अशा सूचना त्यांनी आयुकत शेखर सिंह यांना केली.