नेवासा) – मागील वर्षी अतिवृष्टीने तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची कपाशी, तूर, बाजरी, मका व फळबाग या पिकांचे नुकसान झालेले होते. पिकांचे मागील वर्षी पंचनामे करण्यात आलेले होते. पाऊस वेळेवर पडत नसल्यामुळे बळीराजा आता खचून गेलेला आहे. त्यातच उशिरा का होईना बळीराजाच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली. मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्यांना पिकाची भरपाई मंजूर होऊनही यादीमध्ये नावे आली. ही नुकसान भरपाई आलेली नसून शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरलेली आहे. ही भरपाई त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी म्हणून तहसील कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेले होते.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मध्यस्थी केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलेले होते. खासदार लोखंडे यांनी आठ दिवसांत मागील २०२२ वर्षीची नुकसान भरपाई जमा होईल, असे आंदोलनकर्त्यांना सांगितलेले होते. जवळपास चार महिने उलटून देखील नुकसान भरपाई जमा न झाल्यामुळे येत्या आठ दिवसांत तहसील कार्यालयाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा (दशक्रिया विधी) आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन मुख्यमंत्री व तहसीलदार यांना पाठवण्यात आले. यावेळी कमलेश नवले, छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, प्रदीप आरगडे, अक्षय बोधक, राहुल कांगुणे, आप्पासाहेब आरगडे आदी शेतकरी उपस्थित होते.