पाथर्डी – तालुक्यातील माळीबाभूळगाव, हत्राळ ते पाडळी या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून, नियमानुसार काम करून दर्जेदार काम व्हावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर टकले व ग्रामस्थांनी दिला आहे. हत्राळ, सैदापूर, पाडळी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे. या कामाच्या दर्जाबाबत कोणत्याही अंदाजकपत्राप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप या परिसरात असणाऱ्या नागरिकांनी केला आहे.
सुमारे ७५ लाख किमतीच्या माळी बाभूळगाव ते हत्राळ-पाडळी रस्त्याचे काम माळीबाभूळगावच्या प्रांताधिकारी कार्यालयापासून हत्राळ शिवरस्तापर्यंत काम प्रगतीपथावर आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने आत्ताच या रस्त्यावरची डांबर मिक्स खडी उघडी पडली आहे. कमी डांबर असल्याने ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहे. रस्त्यावर काही ठिकाणी साईट पट्ट्या, रस्त्याचे उंचीचे प्रमाणात न भरता कमी भरलेल्या आहेत. रस्त्याचे दोन्हीही बाजूने साईट गटार केली नसून त्यामुळे रस्त्याचे आयुष्य कमी होणार आहे.
पाऊस काळात पाणी वाहते. रस्त्याला साईट गटार नसतील तर रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. दोन्हीही बाजूचे झाडे झुडपे, काट्या काढून साफ सफाई करताना काही जागी सोडून दिलेले आहे. रस्त्यावर टाकलेली खडी कमी प्रमाणात टाकलेली आहे. त्यामुळे आत्ताच त्याची खबरदारी घेऊन हे काम चांगल्या पद्धतीने करावे. जोपर्यंत काम चांगले होत नाही, तोपर्यंत ठेकेदारास बिल अदा करू नये, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. विष्णूपंत केदार, परमेश्वर टकले, दिलीप कचरे, रावसाहेब काळे, प्रकाश कचरे, स्वप्निल टकले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.