शेवगाव – यावर्षी पावसाने दगा दिल्याने दिवाळी सणावर दुष्काळाची छाया पडली आहे. शेतकरी वर्ग अडचणीत सापडला. मात्र नोकरदार, सेवानिवृत्ती धारक, शासनाच्या विविध निराधार योजनाचे लाभधारक, यांचे पगार व बोनस उपलब्ध झाल्याने तालुक्यात कोट्यवधीचे चलन फिरल्याने बाजारपेठेत चैतन्य आले.
विविध खात्यातील सेवानिवृत्ती धारकाचे पेन्शन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, पंचायत समिती, बॅंका, महसूल आदि शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच झाले. ही रक्कम किमान आठ कोटीवर असेल. तसेच तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ अशा निराधार योजनेच्या 22 हजार 750 लाभार्थींना देखील तब्बल साडेसहा कोटीचे अनुदान प्राप्त झाल्याने हा सर्व पैसा चलनात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील नुकत्याच झाल्याने चलन वाढले आहे.त्यामुळे बाजारपेठेत जान आली आहे.
पावसाअभावी संपूर्ण तालुक्यात दुष्काळाचे सावट पसरले आहे. कपासीचे उत्पन्न घटले. इतर खरीप पिकांनीही दगा दिल्याने शेतकऱ्याने केलेला खर्च ही निघण्याची भ्रांत आहे. तशात किराणा कपडे व इतर साहित्याच्या किंमती दहा-वीस टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्याचे आर्थिक गणित कोलमडले. त्याचा परिणाम दिवाळीच्या खरेदीवर होणे स्वाभाविक असले तरी दिवाळीचा सण हा बहुतेक सर्वच धर्मियांचा वीक पॉईंट आहे.
त्यामुळे शेवगावसह प्रमुख गावच्या बाजारपेठा सजल्या आहेत. आकाश कंदिल, पणत्या, इलेक्ट्रीकच्या आकर्षक माळा, विविध रंगाच्या रांगोळ्या, रांगोळ्याचे तयार साचे, लक्ष्मी व पुजेचे साहित्य तसेच फटाके, कपडे, किराणा, खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे.