पाथर्डी – तालुक्यातील करोडी ते टाकळीमानूर रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे. मुंडे कन्स्ट्रक्शन, शेवगाव या ठेकेदारास काम मिळाले आहे. फक्त तांत्रीक बाबीमुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळाला नाही. ठेकेदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यावर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारास कार्यारंभ आदेश मिळेल. लगेचच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक ज्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे, त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करून काम आम्हीच काम मंजूर केले, यासाठी जनतेची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तालुक्यातील जनता सुज्ञ असून काम करणारे कोण व फक्त राजकारण करणारे कोण हे जनतेला माहीत आहे. विरोधकांच्या षडयंत्राला तालुक्यातील जनता कदापी बळी पडणार नाही, असा टोला आमदार मोनिका राजळे यांनी लगावला.
तालुक्यातील टाकळीमानूर ते करोडी रस्ता मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने करोडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यास आमदार राजळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांचे आंदोलन हास्यास्पद आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या रस्त्यासह मतदारसंघातील इतर रस्त्याचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सामावेश करावा, यासाठी अनेक वेळा मागणी व पाठपुरावा केला, मात्र त्यांनी एकाही रस्त्यासाठी निधी मंजूर केला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ग्रामविकासमंत्री महाजन यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला. त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोनमधून रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. ग्रामविकास विभागाकडून दि. ८ मार्च रोजी प्रशासकीय मान्यतासुद्धा मिळालेली आहे.
ठेकेदार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होऊन मुंडे कन्स्ट्रक्शन, शेवगाव या ठेकेदाराला रस्त्याचे काम मिळाले. मात्र, काही तांत्रीक करणामुळे ठेकेदारास कार्यारंभ आदेश होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. संबंधित ठेकेदाराकडून कागदापत्रांची पूर्तता होताच ठेकेदार प्रत्यक्ष कामास सुरुवात करतील. मात्र, महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे विरोधक राजकीय स्वार्थासाठी मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भांडवल करून उपोषण, रस्ता रोको आंदोलन करून मंजूर श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.विरोधकांनी विकासकामात आडकाठी न आणता सहकार्य करावे, अन्यथा मतदारसंघातील सुज्ञ जनता त्यांना आगामी सर्वच निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल, असा इशारा दिला.