पाथर्डी – शहरातून जाणारा कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) या राष्ट्रीय महामार्गावर ग्रामदैवत दक्षिणमुखी पोळा मारुती मंदिर आहे. येथील रस्त्यावरून अत्यंत वेगाने वाहने जात असल्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून, या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे व जगदीश गाडे यांनी केली आहे. पंधरा दिवसात गतिरोधक न बसवल्यास राष्ट्रीय महामार्गाच्या पाथर्डी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले होते. सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी हे काम पूर्ण झाल्यानंतर वेगात वाहने धावत आहेत. या पोळा मारुती मंदिराजवळ चांदगाव रस्ता, कोरडगाव रस्ता, पाथर्डी शहराकडून येणारा रस्ता, खोलेश्वर मंदिराकडून येणारा रस्ता, तसेच कसबा पेठेतून येणारा रस्ता या मार्गावरून येणारी वाहने मारुती मंदिर परिसरात एकत्र येऊन समोरासमोर येत आहे. त्यामुळे अपघाताची परिस्थिती ओढवत आहे.
याबाबत माहिती देताना बोरुडे म्हणाले की, रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने नांदेड, परभणी, बीड, माजलगाव, गेवराई, हिंगोली, तसेच श्रीक्षेत्र भगवानगड, श्रीक्षेत्र मोहटादेवी येथे येणारे भाविक आणि प्रवासी मोठ्या स्वरूपात या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करत आहे. मुंबई, पुणे, कल्याणकडे जाणाऱ्या खासगी आराम बस वेगाने धावत आहे. मंदिरापासून शंभर फुटांच्या अंतरावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अमरधाम आहे. अंत्यविधीसाठी जाणाऱ्या लोकांची गर्दीसुद्धा वाहनचालकांकडून दुर्लक्षित होऊन एका बाजूने वाहने नेण्याचा प्रयत्न होतो. येथील राहणाऱ्या रहिवाशांच्या लहान मुलांसह नागरिकांचा जीव भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीमुळे टांगणीला लागला आहे. मंदिर परिसराच्या रस्त्यावर येत्या पंधरा दिवसांत गतिरोधक न बसवल्यास येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा बोरुडे व गाडे यांनी दिला आहे.