भेसळयुक्त मिठाईची विक्री; अन्न व औषधे प्रशासनाचा निद्रीस्त कारभार
जामखेड – दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी विक्री होत असलेल्या मिठाईचा दर्जा तपासण्यासाठी तालुक्यात यंत्रणाच नसल्यामुळे बाजारातील भेसळयुक्त मिठाई खाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचा निद्रीस्त कारभार सुरू असून आतापर्यंत या विभागाने फक्त जामखेड तालुक्यात एकच कारवाई केली. यामुळे विक्रेतेही सध्या बिनधास्त असल्याचे चित्र दिसत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तयार फराळ व मिठाई घेण्यावर नागरिकांचा भर आहे. शहरातील विविध ठिकाणी आकर्षक मिठाई विक्रीसाठी उपलब्ध आहे. शिवाय काही हंगामी स्वरुपात स्टॉल थाटण्यात येत आहेत. दिवाळीला आवश्यक फराळापासून विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी आहेत. मात्र, याच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी सध्या कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याची स्थिती आहे. दिवाळीत सर्वाधिक खाद्य पदार्थांची विक्री होते.
अधिक नफ्यासाठी मिळविण्यासाठी काहीजण भेसळयुक्त पदार्थ विकण्याची शक्यता अधिक असते. मात्र, आपण घेत असलेली मिठाई नेमकी कशी आहे, याची कल्पनाच नागरिकांना येत नाही. तयार खाद्यपदार्थांवर नियंत्रणाचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे. मात्र, हा विभाग सध्या निद्रीस्त असल्याची परिस्थिती आहे. परिणामी कारवाया कमी झाल्या आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा बाजारावरील वचक कमी झाला आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी हा विभाग कार्यरत आहे की नाही, अशी शंका निर्माण होत असून ग्राहकांना मात्र, कोणताही आधार उरलेला नाही. इच्छाशक्ती गमावलेल्या व आळसावलेल्या अधिकाऱ्यांना हे देखील जमत नाही. शहरात अनेक ठिकाणी अन्न पदार्थ विक्रीच्या दुकानात नियमांची पायमल्ली होते. तेथेही कारवाई करण्याची तसदी विभाग घेत नाही.
नेमक्या कारवाया का होत नाहीत. त्यामुळे याचे गौडबंगाल समजण्यास तयार नाही. विक्रेत्यांसोबतचे अर्थ’पूर्ण संबंध तर याला कारणीभूत नाहीत ना, अशी शंका घेतली जात आहे. आतापर्यंत या विभागाने जामखेड तालुक्यात एकच कारवाई केली असून त्यानंतर या विभागाचे अधिकारी तालुक्यात फिरकत नसल्याने स्विट होम, बेकरी, दुकानदाराचे फोफावत आहे.