पारनेर – तालुक्यातील सांगवी सूर्या येथे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे साखळी उपोषण चालू असताना शासनाकडून दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी जवळे व पानोलीत एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शेतकरी आपल्या जनावरांसह सामील झाले होते.
पंधरा दिवसांपूर्वी सांगवी सूर्या पंचक्रोशीत प्रचंड गारपिटीने थैमान घातले होते. फळपिके, चारापिके, भाजीपाला पिके पूर्ण नष्ट झाली होती.
गारांमुळे काही शेतकरी व जनावरे जखमी झाली. या आपत्तीनंतर राज्यकर्ते व अधिकारी यांचे पाहणी दौरे झाले. परंतु प्रत्यक्ष मदत कुणालाही मिळाली नाही. जनावरांना चारा नाही, त्यामुळे चारा डेपो चालू करण्याची मागणी होती. आतापर्यंत केवळ नुकसानीचे पंचनामे व कागदी सोपस्कार पूर्ण झाले आहेत. चारा पुरवठ्याची तरतूद शासनाकडे नाही, असे अजब उत्तर निवासी तहसीलदार यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन दिले.
केंद्र शासनाने अचानक घेतलेल्या कांदा निर्यातबंदी, इथेनॉल निर्मितीस बंदी, दुधाचे घसरलेले भाव यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. केंद्र सरकारला जुलमी सरकार म्हणून यावेळी शेतकऱ्यांनी मोठी घोषणाबाजी केली. सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. पानोलीत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करत दूध रस्त्यावर ओतले. आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
निवडणुकांवर बहीष्काराचा ठराव
शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास व गारपीटग्रस्तांना भरपाई न दिल्यास पीडीत गावे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत. विशेष ग्रामसभा बोलावून तसे ठराव केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहेत. तसा ठराव देखील आंदोलनावेळी सर्वानुमते घेण्यात आला.
राजकारण शेतकऱ्यांच्या मुळावर
पारनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार व खासदार यांच्यातील राजकारणाचा फटका गारपीटग्रस्तांना बसत आहे. एकीकडे शेतकरी होरपळत असताना राज्यकर्ते व त्यांचे कार्यकर्ते यांची मीडियाबाजी जोमात चालू आहेत. मदतीच्या श्रेयवादामुळेच गारपीटग्रस्त वंचित राहिल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी दोघा लोकप्रतिनिधींवर केला.
पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची मागणी विधानसभेत लक्षवेधीच्या रूपाने
मांडली. त्यावर शासन काही हालचाल करणार का ? याची वाट शेतकरी पाहत आहेत.
– रामदास घावटे, जवळा.