कोपरगाव (प्रतिनिधी) – येणारा काळ कठीण असून दुष्काळाचे संकट मोठे आहे. उस उत्पादक सभासद, शेतकरी, कामगार आणि व्यवस्थापन एकमेकांच्या सहकार्याने हिंमतीने त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करत लक्ष्मीची छत्रछाया सर्वांना मिळावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे लक्ष्मीपूजन सालाबादप्रमाणे याही वर्षी रविवारी कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले. कारखान्याला संकटे नवीन नाही. संकटावर मात करत 61 व्या गळीत हंगामाची यशस्वी सुरुवात केली असून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण सदैव पाठीशी आहे. चालू वर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने उस पिकांसह, अन्य सर्वच कृषी उत्पादनांत घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवाळसण साजरा करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कारखान्याने आधुनिकीकरणाची कास धरत प्रति दिवस दैनदिन गाळप क्षमता 6 हजार मे टन केली आहे. बचत ही भविष्यकाळाची मोठी साथ आहे. खर्च कमी करा, खोडवा-दूरी, उस उत्पादन वाढवा, पाचट अच्छादन करा, पाण्याच्या बचतीसाठी शेततळी वाढवा, दर्जेदार अधिक उत्पादन देणाऱ्या उस बेण्याचा वापर करून ठिबक सिंचनाची साथ घ्या, भावनांना आवर घाला, शुभविवाह, साखरपुडे, समारंभ आदी कमी खर्चात थोडक्यात साजरे करा, चुकीच्या दिशेला जाऊ नका, जून्या सवयींना लगाम घाला, बचत करा तरच लक्ष्मी स्थिर राहील, येणाऱ्या कठीण काळात आपली साथ महत्त्वाची असणार आहे असेही ते म्हणाले.
यावेळी विश्वासराव महाले, ज्ञानेश्वर परजणे, विलासराव वाबळे, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, सतिष आव्हाड, तुळशीराम माळी, रमेश आभाळे, रमेश घोडेराव, त्र्यंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, शिवाजीराव वक्ते, बाळासाहेब संधान, संजय होन, सोपानराव पानगव्हाणे, फकिरराव बोरनारे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सचिव तुळशीराम कानवडे यांनी केले.
पाटपाण्यासाठी कोल्हे कारखाना सर्वोच्च न्यायालयात
उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाटपाण्याचा संघर्ष कायम आहे. कमी पाणी असल्याने वरच्या धरणांतून जायकवाडीला पाणी सोडून त्याचा अपव्यय होणार आहे. त्यासाठी कोल्हे कारखान्याने सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी होत आहे असे बिपीन कोल्हे म्हणाले.