पारनेर- महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, या संस्थेच्या संचालक मंडळांची सभा नगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी उपस्थित होते. पोल्ट्री व्यावसायिकांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी बचाव मोहीम नगर जिल्ह्यामधून सुरू झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल खामकर यांनी केंद्र सरकारने पोल्ट्री फार्मला लागू केलेल्या गाईडलाईनची अंमलबजावणी राज्य सरकारने लवकरात लवकर करावी, यासाठी संघटनेचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. परंतु यासाठी महाराष्ट्रातील सर्व पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी कंपनीच्या कोणत्याही दडपणाला बळी न पडता संघटित होणे आवश्यक आहे.
सचिव साळवी यांनी कुक्कुटपालन हा शेतीपूरक व्यवसाय असूनही या व्यवसायासाठी उभारलेल्या शेडवर ग्रामपंचायतीकडून अवास्तव कर आकारणी केली जाते. शासन एका बाजूला शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध योजना राबवत आहे, तर दुसरीकडे ग्रामपंचायतकडून या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सरकारने पोल्ट्रीसाठी गाईडलाईन लागू करण्यासाठीचा जीआर काढून इतकी वर्ष झाली. परंतु आजही एकही इंटिग्रेशन करणारी कंपनी या गाईडलाईन पाळत नाही. मग या कंपन्यावर असा कोणता वरदहस्त आहे, असा सवाल केला. महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन सचिव यांनी पशुपक्षी खाद्याच्या प्रत्येक बॅगवर त्यामधील खाद्याच्या घटकांची नोंद असावी, असे पत्र काढूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे हा विभाग पशुसंवर्धन आहे की कंपनी संवर्धन आहे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया कार्याध्यक्ष सर्जेराव भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी कार्याध्यक्ष पुणे विभाग गोडंबे, नंदकुमार चौधरी, बाळासाहेब देशमुख, रवींद्र कराडे, संघटक गोपाळे, रावसाहेब बेडसे, किशोर पाटील, सुभाष काष्टे, विनोद जाधव, तानाजी घाडगे, प्रदिप खैरनार, किशोर गोवारी, योगेश पाटिल, दीपक पाटिल, वैशाली बांगर, संस्थेचे खजिनदार प्रकाश लसणे यांच्यासह पदाधिकारी या दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पूर्व सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष गणेश झावरे, उपाध्यक्ष प्रविण धरम, संचालक संजय खिलारी, संतोष पानमंद, रंगनाथ शिंदे, पांडुरंग वाळुंज, स्वप्नील रोडे, संकेत सुपेकर, दादा ताठे, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सहसचिव राजु गजरे यांनी ही सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.