सातारा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग पंढरपूर येथील कार्तिक एकादशी सोहळ्यासाठी सज्ज झाला असून दि. 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान यात्रा कालावधी असून जिल्ह्यातील 11 आगारांमधून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुमारे 105 जादा बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, गुरूवार दि. 23 नोव्हेंबर रोजी कार्तीक एकादशी सोहळा असल्याने यात्रेचा मुख्य दिवस आहे.सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज,दहिवडी, मेढा या 11 आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कराड आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांची पंढरपूर येथे यात्राप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
यात्रेसाठी सातारा 10, कराड 15, कोरेगाव 8, फलटण 15, वाई 8, पाटण 8, दहिवडी 10, महाबळेश्वर 5, मेढा 9, पारगाव खंडाळा 5, वडूज आगारातून 12 असे मिळून 105 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यात्रेसाठी 2 वाहतूक निरीक्षक, 3 सहाय्यक वाहतूक निरीक्षक, 7 वाहतूक नियंत्रक, लेखनिक, रोखपाल असे मिळून 14 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चालकाने बस चालवत असताना मोबाइलवर संभाषण करू नये, असे कोण आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पलंगे यांनी दिला आहे. दरम्यान, यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर येथे येणाऱ्या जाणाऱ्या बसेसच्या तपासणीसाठी सातारा, पुसेगाव, दहिवडी, गोंदवले, म्हसवड, पिलीव या मार्गावर तपासणीसाठी पथक तैनात करण्यात येणार आहे. यावेळी एसटी चालक व वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रवाशांचा, भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी महामंडळाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून यामुळे पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्यांचा प्रवास सुरक्षित होणार आहे.
पंढरपूर यात्रेसाठी सातारा विभागाच्या विविध आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित करण्याचा आमचा ठोस प्रयत्न असून या जादा बसेसच्या सुविधेचा लाभ प्रवाशी व वारकऱ्यांनी घ्यावा.
रोहन पलंगे,विभाग नियंत्रक, सातारा