महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीत सातारा उपकेंद्रावर दुसऱ्या दिवशी कराड येथील श्रीनिवास एकसंभेकर यांच्या आशय संस्थेचे ‘घोटाळा झाला’ हे लेखक जयसिंग पाटील व ओंकार आपटे दिग्दर्शित दमदार संहिता असलेले नाटक सादर झाले. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर आपली पोळी भाजून घेणारा अधिकारी वर्ग यावर प्रकाशझोत टाकणारे हे नाटक अनेक गोष्टीवर प्रहसनात्मक भाष्य करत सादर झाले. वग-बतावणीच्या पद्धतीने नाटकाची मांडणी दिग्दर्शकाने केलेली आहे.
गुरुशिष्य परंपरेतील इंद्र, वरु आणि व्याडी आश्रमातील तीन विद्यार्थी. त्यांचे शिक्षण संपताना त्यांना गुरुदक्षिणा म्हणून आश्रमासाठी 1000 कोटी सुवर्णमुद्रा गुरुमाउली मागते. त्या सुवर्णमुद्रा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये संपूर्ण नाटक घडते. तीन शिष्यांपैकी इंद्र हुशार आणि विविध कलांमध्ये निपुण असतो. त्याला परकाया प्रवेशाची कला प्राप्त असते. गुरुदक्षिणा मिळवण्यासाठी इंद्र या कलेचा वापर करायचे ठरवितो. एका नगराचा राजा इंद्रसेन याच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश करुन 1000 कोटी सुवर्णमुद्रा गुरुंना देण्याचा प्रयत्न करायचे ठरवितो. या कामामध्ये वरू आणि व्याडी साथ देतात. इंद्रसेन राजाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर इंद्र त्याच भूमिकेमध्ये अडकून पडतो. इंद्र आणि वरु दोघे राजा आणि प्रधान बनून त्या राज्यावर राज्य करू लागतात.
परंतु, राजा इंद्रसेनला संपविण्यासाठी प्रयत्न करणारा त्याचा प्रधान आणि त्याची पट्टराणी यांच्या कटकारस्थानाचा सुगावा मूळ इंद्राला लागतो.तो त्या दोघांनाही देहदंडाची शिक्षा सुनावतो. असे करत करत राजा इंद्रसेन जो प्रत्यक्ष इंद्र असतो तो वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला संपविण्याचा प्रयत्न करतो. आजच्या राजकीय परिस्थितीला साजेसे राजदरबारातील दोन शिपाई स्वतःचे उखळ पांढरे करीत असतात. 1000 कोटी सुवर्णमुद्रा गुरूंपर्यंत पोहोचल्या नाहीत हे समजल्यावर इंद्र त्याचा जाब वरू याला विचारतो आणि त्याला देहदंड देऊन संपवून टाकतो. सर्व गोष्टींचा उबग येऊन राजा इंद्रसेन बनलेला मूळ इंद्र स्वतःलाच संपवून टाकतो.
अशी मांडणी केलेली संहिता. यातील मध्यवर्ती पात्र इंद्र आणि राजा ही पात्रे साकारणारे मकरंद किर्लोस्कर दोन्ही पात्रांना वेगवेगळे मांडण्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत. समीर कुलकर्णी यांचा वरू आणि विजय कुलकर्णी यांचा व्याडी याची उत्तम साथ आहे. काळू (जगन्नाथ पवार) आणि बाळू (शार्दूल पालकर) हे राजदरबारातील शिपाई आजच्या सरकारी नोकरदारांचे प्रतिनिधित्व करतात. सुनील आचार्य यांचे गुरुदेव पात्र भाव खाऊन गेले. डॉ. अनिकेत जोशी यांनी साकारलेला प्रधान उत्कृष्ट.
आसावरी पंडित यांची गुरुमाता व राणीच्या भूमिकेतील स्वप्नजा बर्वे यांचा अभिनय सहज सुंदर तर वरद साने आणि वीरेंद्र साने या जुळ्या भावांची साथ चांगली होती. गजानन धर्माधिकारी आणि पांडुरंग शिंदे यांनी रंगमंचावरील प्रत्येक घटनेला अनुरूप लाईव्ह संगीत दिले. ओंकार चिटणीस यांची प्रकाश योजना वैविध्यपूर्ण. प्रशांत कुलकर्णी यांचे नेपथ्य अनुरूप वाटले. निर्मिती प्रमुख म्हणून श्रीनिवास एकसंबेकर यांनी काम पहिले. “घोटाळा झाला..!’ या नाटकाचा प्रयोग सुरेख- सुंदर सादर झाला. यावर्षीच्या नाट्य स्पर्धेचा दर्जा उंचावत चालला आहे, असे ठामपणे म्हणावे लागेल. गुरुवार 23 नोव्हेंबर स्पर्धेचा सुट्टीचा दिवस असून शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी लोकरंगमंच सातारा यांचे “दार उघडचंय घराचं’ नाटक सादर होणार आहे.
– नीतिराज देशमाने