नगर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अडचणींना सामोरे जावे लागते. यात वीज नियमित आणि सुरळीत पुरवठा हा मोठा प्रश्न असून, शेती वीजविलाचा ग्राहकांना अतिरिक्त भरणा करावा लागत असल्याने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संतप्त झाले आहेत. या बाबत त्यांनी जिल्ह्यातील विस्कळीत वीज पुरवठा आणि गैरवाजवी वीज बिलाची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्ह्याच्या उत्तरेकडे असलेले धरण, नदी आणि पाटांनी वाहणारे पाणी ही मोठी देणगी असली, तरी विजेचा लपंडाव, रात्रीची वीज, त्यामुळे श्वापदांची भीती, बिघडलेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी करावी लागणारी स्थानिकांना वर्गणी, भारनियमन असे वीज वितरंणाचे वाभाडेच खासदार वाकचौरे यांनी काढले. यात तातडीने सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबतचे लेखी पत्र खासदार वाकचौरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि वीज वितरणच्या कार्यकारी संचालकांना पाठवले आहे. खरिपात पडलेला अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे रब्बीचे पीक धोक्यात असताना पाटपाण्याद्वारे मिळणारे पाणीही विजे अभावी वाया जाणार असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा लागेल.