कोपरगाव – अयोध्येत होत असलेल्या श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिवसेंदिवस शिगेला पोहोचला असून, या दिवशी आपापल्या परिसरातील मंदिरांची साफ सफाई करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील मंदिरात साफसफाई केली.
पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोपरगाव दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कोपरगाव शहरात महापुरुषांना अभिवादन करून शहरातील मंदिरात साफ सफाई केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत आ.आशुतोष काळे यांनी देखील मंदिरात साफसफाई केली. यावेळी कोपरगाव शहरातील अनेक मान्यवरांसह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ना. विखे यांनी कोपरगाव शहरात आ. आशुतोष काळे यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहरातील वातावरण श्रीराममय करून टाकल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे कौतुक केले. पाचशे वर्षांनंतर आलेला हा ऐतिहासिक व अभूतपूर्व सोहळा नागरिकांनी दिवाळी सारखा मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन आ. काळे यांनी केले.
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगावकरांच्या वतीने रविवारी सायंकाळी ४ वाजता विघ्नेश्वर चौक येथून भगवा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये बहुसंख्येने कोपरगावकरांनी सहभागी व्हावे. तसेच सोमवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता गोदावरी मातेची महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर लेझर शो, भजन संध्या, फायर शो तसेच रॉक बँड म्युझिकल फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
-आ.आशुतोष काळे