संगमनेर – संगमनेरात अनेकवेळा कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना देखील येथील कसायांवर काहीच फरक पडत नसल्याचे दिसून येते. उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळताच त्यांनी पथकाला पाठवत पिकअपसह सुमारे ५०० किलो गोमांस जप्त केले. तसेच या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असताना संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असल्याचे दिसून येते. वारंवार कारवाया करूनही कसाई सुधारायचे नाव घेत नाहीत. मात्र, उपअधीक्षक वाघचौरे यांनी कठोर कारवाया करत असून मंगळवारी रात्री त्यांना काही कसाई शहरातील जमजम कॉलनी येथन एका पिकअपमधून मुंबई येथे गोमांस जाणार असल्याची माहिती मिळाल्याने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस नाईक राहुल डोके व सहकाऱ्यांनी जोर्वे नाका येथे छापा टाकला. यावेळी एक संशयित पिकअप पुना रोडने जाताना दिसल्याने पिकअपचा पाठलाग करून हा पिकअप खांडगांव फाटा येथ रात्री 12.45 वाजता पकडण्यात आला.
यावेळी चालक हलिम शेख युसुफ (वय 49 रा. कासारा जि. ठाणे हल्ली रा. भारतनगर संगमनेर) याला ताब्यात घेण्यात आले. या पकडलेल्या पिकअपमध्ये कत्तल केलेले गोमांस मिळुन आले. हे गोमांस कुणाच्या मालकीचे आहे , याची चौकशी केली असता अनिस गुलामहैदर कुरेशी (रा. मदिनानगर संगमनेर) याचे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा पिकअप ( एम एच 15 एफ व्ही 6862) तर एक लाख रुपये किमतीचे 500 किलो गोमांस, असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हलिम शेख युसुफ, अनिस गुलामहैदर कुरेशी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.