मुंबई – शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे झाले.
दरम्यान, सत्तार हे प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करतांना दिसले. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणार आहेत. तसेच प्रत्येकांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार
सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत जाणेसाठी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात आज पासून महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून केली आहेत. धारणी तालुक्यातील साद्रावाडी या अत्यंत दुर्गम ,डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल गावात संजू धांडे, विनोद धांडे, अनिल धांडे, सुनील धांडे, रवींद्र सावळकर शैलेंद्र सावळकर परिवाराच्या घरी रात्री जेवण करून येथेच मुक्काम केला.
आज संपूर्ण दिवसभर मी शेतकऱ्यां सोबत असणार
राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या अनुषगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.