पुसेगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने कटगुण, ता. खटाव येथे आंदोलन करण्यात आले. केंद्राने हे अन्यायकारक कायदे मागे घेऊन म. जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांवर नवे कृषी धोरण ठरवले पाहिजे, अशी मागणी करताना सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
महात्मा फुले यांच्या मूळ गावी कटगुण येथे झालेल्या या आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई, डी. के. बोडके, ऍड. शरद जांभळे, सुधीर नलवडे, दिलीप पाटील, व्यंकटराव पन्हाळकर, ऍड. धम्मसागर भारती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा सहभाग होता. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आंदोलकांशी संवाद साधला.
ते म्हणाले, केंद्राने नवे कृषी कायदे मागे घेतलेच पाहिजेत; परंतु ते मागे घेतले म्हणजे शेतकऱ्यांचे शोषण संपेल, असे नाही. त्यासाठी महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या भूमिकेच्या पायावर पर्यायी कृषी धोरण स्वीकारले पाहिजे. हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पुढाकार घेईल.