दुरूस्तीचे काम सुरू केल्यावरच आंदोलन मागे घेतले
लोणंद ( प्रशांत ढावरे) : लोणंद शिरवळ रस्त्याची झालेली दैना पाहता बावकलवाडी, मरिआईचीवाडी परिसरातील तरूणांनी एकत्र येत रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनाला यश येवून तातडीने दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी बावकलवाडी येथील युवकांनी लोणंद शिरवळ रस्त्यावर मरिआईची वाडी फाट्यावर खराब रस्त्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने तो तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. मात्र आचारसंहिता संपताच या तरुणांनी पुन्हा आक्रमण पावित्रा घेत रविवारी सकाळी मरिआईचीवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी या आंदोलनाची दखल घेत बारामती येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विश्वास ओव्हाळ यांनी आंदोलनकर्त्या तरूणांची भेट घेऊन त्वरीत दखल घेत रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात केली. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन विश्वास ओव्हाळ यांनी दिले. या आंदोलनस्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि संजय बोंबले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या आंदोलनात गणेश केसकर, किशोर धायगुडे, अजित पवार, तुषार गावडे, गणेश शिर्के ,अंकुश माने विकास धायगुडे, मयूर पाडसे, लाला धायगुडे, सुरज शेंडगे, साहिल बोराटे संदीप केसकर, हेमंत केसकर व भादे गणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय नेत्यांच्या व गावपुढाऱ्यांच्या मागे पळण्यात धन्यता माननारी आजची तरूणाई दिसत असताना बावकलवाडी परिसरातील हे युवक जनतेच्या सोईसाठी कुठल्याही पुढाऱ्याच्या पुढे हात न पसरता संविधानीक मार्गाने आंदोलन करून न्याय मिळवण्यासाठी धडपड करताना दिसतात हे नक्कीच उद्याच्या उज्ज्वल भारताच्या भवितव्याबद्दल प्रेरणादायी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करून “हे तर तरूणाईचे यश” असल्याचे प्रांजळ कबुली दिली.
लोणंद ते शिरवळ रस्त्याची तात्काळ दुरूस्ती होण्यासाठी आंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे…
(१) शिरवळ-लोणंद एम. एच. -एस. एन ७० रोडवर जेवढे छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत ते पुढील दोन
दिवसात बुजवून रोड सर्वासाठी पुर्ववत चालू करावा.
(२) जो पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता ठिक होत नाही तोपर्यंत पंढरपूर फाटा व लोणंद शिरवळ फाटयावर अवजड वाहने नेण्यास मनाई असे फलक लावण्यात यावेत .
(३) रस्त्यासाठी २२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर रस्त्याचे काम चालू करण्याची तारीख व आत्तापर्यंत
लोकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबाबत जनतेची माफी मागणारे फ्लेक्स तयार करून जेथे मोठे खड्डे आहेत त्या ठिकाणी लावण्यात यावेत .
(४) शिरवळ -लोणंद रोडवर जेथे जेथे माहिती फलकांची गरज आहे त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावेत.
५) येथून पुढे रस्ता जोपर्यंत दुरूस्त होत नाही तो पर्यंत या रस्त्यावर जेवढे अपघात व गाडयांचे नुकसान होईल
त्या सार्वजनिक बांधकाम विभाग जवाबदार राहील. आर्थिक नुकसान भरपाईची संपुर्ण जबाबदारी सार्वजनिक
बांधकाम विभागाची राहील.