जामखेड – लग्नासाठी मुलींची टंचाई लक्षात घेऊन मराठवाड्याच्या काही भागातून वधू शोधून आणल्या जात आहेत. मात्र, या मुली नवरदेवाच्या हातावर तुरी देऊन लग्नानंतर गाशा गुंडाळून धूम ठोकत असल्याचे निदर्शनास आले आहे. सोयरिकीच्या नावाखाली फसवणुकीचा फंडा’ असे वृत्त दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित होताच जामखेड तालुक्यातून अशा अनेक घटना उघडीस येऊ लागल्या आहेत.
शहरात मागील वीस दिवसांत अशा चार घटना घडल्या आहेत. यात दोन घटनांमध्ये तर लग्न केल्यानंतर असलेल्या धामधूमीतच नववधू नवरदेवाला सोडून गेल्याचे समोर आले आहे. त्या गेल्याच पण जाताना दोन ते चार लाख रुपयांना गंडा घातला गेल्याने नवरदेवांकडील लोकांचा पोपट झाला. इज्जतीच्या भीतीपोटी अद्यापपर्यंत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले नाही.
अविवाहित मुलांना चांगले स्थळ मिळवून देतो, असे सांगून घटस्फोटित महिलांशी लग्न लावून देत मुलांच्या भावनेशी खेळण्याचा फंडा एजंटाकडून होत आहे. मुली मिळत नसल्याने एजंटांकडून होणाऱ्या मागणीला मुलांचे माता-पिता बळी पडत असल्याच्या घटना जामखेडमध्ये घडत आहेत. आर्थिक लूट होत आहे. विवाह लावून देऊन दोन महिने संसार करून पुन्हा सोन्याच्या दागिन्यांसह पसार होणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे पालकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
सांगली, सातारा, सोलापूर परिसरातील काही बंटी-बबली महिला व पुरुष एजंट जामखेडसह परिसरात वरांना गाठून त्यांना सोलापूर, पंढरपूरसह कर्नाटकातील हुबळी, धारवाड, अथणी जिल्ह्यातील घटस्फोटित मुलींचा फोटो-बायोडाटा दाखवतात. स्थळ पाहायला गेल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांना एजंट मुलगी पसंत असेल तर तत्काळ लग्न करून टाकू, मुलीच्या आई-वडिलांचा आमच्यावर विश्वास आहे, अशी मुलगी परत मिळणार नाही, असे सांगून गळ घातली जाते.
आपल्या मुलाचा विवाह होत आहे म्हणून आनंदात आई-वडील हुरळून जाऊन पैसे देतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक होते. मुलगी दोन महिने संसार करते आणि एक दिवस अंगावरील सोन्याच्या दागिन्यासह पसार होते. हे एजंट नव्याने पुन्हा नवरी मुलींना सोबत घेऊन मुलांचे सावज हेरून त्यांच्याशी लग्न जुळवून लुटीचा डाव मांडला जातो.