पुणे – पुणे-पानशेत रस्त्यावरील मागील दोन वर्षांपासून खचत असलेला पूल कोसळण्याच्या स्थितीत आहे. याच भागात पानशेतसह परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वीजवाहक तारांचे खांबही खचत चालले आहे.
यामुळे हा पूल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तर तुटणार आहेच, शिवाय विजेचीही गंभीर समस्या निर्माण होणार आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे-पानशेत रस्ता हा हवेली व वेल्हे तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. स्थानिकांसह पर्यटकांचीही या रस्त्यावरून रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. सध्या खचलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्पुरती भर टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच बाजूने वाहतूक सुरू ठेवलेली आहे. मात्र, दिवसेंदिवस पुलाचा सुमारे दोनशे फूट लांबीचा व पंधरा ते वीस फूट रुंदीचा भाग अधिकाधिक खाली घसरत चालला आहे. या भागावर उच्चदाब वीज वाहक तारांचे दोन खांब असून, तेही खचत चालले आहेत.
यासंदर्भात खानापूर महावितरणचे सहायक अभियंता अतिष इंगळे म्हणाले, ज्या ठिकाणी पूल खचला आहे, तिथे एक खांब रोवून तारांना आधार दिला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर म्हणाले, खचलेल्या पुलाच्या जागी नवीन पूल करण्याबाबत वेगाने कार्यवाही सुरू आहे. निधीला मंजुरी मिळालेली असून, टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील.