मुंबई : अभिनेता सनी देओलचा 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या सिनेमाला मोठे यश मिळाली. या चित्रपटात सनीसह अमीषा पटेल मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील सर्व कलाकरांच्या अभिनयाने आणि कथानकाने सर्वांच्या मनात घर निर्माण केले. गदरच्या यशानंतर तब्बल 22 वर्षांनी ‘गदर’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. गदर 2 ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘गदर 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘गदर 2’ या चित्रपटाच्या अखेरीस ‘जारी रहेगा..’ असे म्हंटले आहे. त्यामुळे याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, “तुम्हाला गदर 3 साठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. संयमाचं फळ गोड असतं, अगदी गदर 2 सारखंच. माझ्या आणि शक्तीमानजी (गदर 2चे लेखक शक्तिमान तलवार) यांच्या मनात काही विचार आले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त प्रतीक्षा करा, सर्वकाही होणार आहे.”
गदर 2 हा तब्बल 22 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्यामुळे चाहत्यांना बराच काळ या चित्रपटाची वाट पाहावी लागली होती. त्यानंतर आता गदर 3 साठी फार काळ वाट पाहावी लागू नये, अशी इच्छाही चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ‘गदर 2’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने एकाच दिवशी 55.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात तब्बल 230 कोटी रुपयांची कमाई केली आहे.