पुणे – सलग दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे दुष्काळी भागात पावसाचा जोर अधिक असल्याने खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरवात झाली आहे. मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामानाने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. गेल्या चोवीस तासांत कोकणात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 148 मिलीमीटर झाला. मराठवाड्यातील अर्धापूर येथे 140 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात सर्वदूर हलका ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या आहेत. त्याचबरोबर तलावाच्या पाणीपातळीत ही थोडी वाढ झाली आहे. या पावसामुळे धोक्यात आलेल्या खरीपाच्या पेरण्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे, तर मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.