मुंबई – शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढलेला नाही किंवा शिवसेना पक्ष सोडण्याचे विधान केलेले नाही. गुवाहाटीवरुन आमदार मुंबईत आल्यानंतर ते जेव्हा शिवसेनेशी चर्चा करतील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलत असताना ते म्हणाले की, शिवसेनेचा इतिहास आतापर्यंत असा आहे की, आधीही काहींनी पक्ष सोडला पण नंतर सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते हे आमदारांसोबत नसून पक्षासोबत असतात. हे शिवसैनिकांनी अनेकवेळा दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेनेत आमदार किती आहेत? त्याची आज चिंता करण्याची गरज शिवसेनेला नाही.
संख्याबळ आणि सरकार टिकवण्यासाठी त्यांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आम्ही चर्चा केलेली नाही, असेही ते म्हणाले.
तसेच वर्षा बंगला सोडून मातोश्रीला जाणे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक निर्णय होता. मात्र आजही ते मुख्यमंत्री असून ते मातोश्रीवरुन काम करत आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.