नवी दिल्ली : – सीबीआयने (CBI) बुधवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर आपची भाजपविरोधातील तक्रार स्वीकारली. इतर पक्षांची सरकारे पाडण्यासाठी प्रचंड पैसा वापरून भाजपकडून राबवल्या जाणाऱ्या (BJP’s Operation Lotus) ऑपरेशन लोटसची चौकशी व्हावी, अशी मागणी त्या तक्रारीत करण्यात आली आहे.
दिल्लीतील सत्तारूढ आपच्या (Aam Aadmi Party)10 आमदारांचे शिष्टमंडळ तक्रार देण्यासाठी सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचले. त्या शिष्टमंडळाला सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची भेट घ्यायची होती. मात्र, त्या भेटीसाठी आत जाण्याची परवानगी शिष्टमंडळाला नाकारण्यात आली. त्यामुळे आप आमदारांच्या शिष्टमंडळाने सीबीआयच्या मुख्यालयाबाहेर सुमारे दोन तास धरणे धरले.
अखेर आपच्या दोन आमदारांना बोलावून सीबीआयने तक्रार नोंदवली. त्यानंतर सीबीआय तातडीने तपास हाती घेऊन सत्य देशासमोर आणेल अशी आशा आपने व्यक्त केली.
तक्रार नोंदवण्याआधी जनतेने निवडून दिलेल्या आमदारांना रस्त्यावरच ताटकळत ठेवण्यात आल्याची घडामोड दुर्दैवी होती. बहुधा, भाजपविरोधात तक्रार असल्यावर सीबीआयला धास्ती वाटत असावी, अशी प्रतिक्रियाही आपने दिली. तसेच, सीबीआयच्या तपासात काय प्रगती झाली याचा दररोज पाठपुरावा करणार असल्याचेही म्हटले.