नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संपुर्ण देशभर ऑपरेशन कमलचा घाणेरडा खेळ खेळून विरोधकांचे आमदार पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न चालवला असून त्यांचा तेलंगणातील हा प्रयत्नही नुकताच उघड झाला आहे असा दावा करीत या प्रकाराबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी जाहीर मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की त्यांनी दिल्ली, पंजाब आणि देशातल्या अन्य आठ राज्यांत हाच फोडाफोडीचा खेळ केला. आता त्यांनी तेलंगणातहीं हाच प्रकार चालवल्याची बाब उघड झाली आहे असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. तेथे ऑपरेशन लोटस राबवणाऱ्या मध्यस्थांना शंभर कोटी रूपयांच्या रोकड सह पकडण्यात आले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
या पत्रकार परिषदेत सिसोदिया म्हणाले की तेलंगणातील सत्तारूढ टीआरएसचे चार आमदार खरेदी करण्यासाठी त्यांना प्रत्येकी 25-25 कोटी रूपये देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. तसेच दिल्लीचे एकूण 43 आमदार खरेदी करण्यासाठी त्यांनी 1075 कोटी रूपयांची तरतूद केली आहे ही बाबही मध्यस्थांच्या ऑडिओ मधून उघड झाली आहे असा दावाही सिसोदियांनी केला आहे.
हे पैसे कोठून आले असा सवाल सिसोदिया यांनी केला. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. तेलंगणातील आमदार फोडाफोडीच्या प्रकारात बी.एल संतोषी आणि अमित शहा ही नावे पुढे आली आहेत. हे अमित शहा म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच आहेत काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि हे अमित शहा तेच गृहमंत्री अमित शहा हे असतील तर ती बाब अधिक धोकादायक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांना अटक करून त्यांची चौकशी झाली पाहिजे, तसेच तेलंगणातील या साऱ्या प्रकाराची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही सिसोदिया यांनी केली. ऑपरेशन लोटस अंतर्गत तेलंगणातील सायबराबाद येथे एका फॉमहाऊसवर 27 ऑक्टोबर रोजी तीन मध्यस्थांमार्फत तेलंगणातील चार आमदारांना शंभर कोटी रूपये देऊन फोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तेथे ते रोख रकमेसह पकडले गेले आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध झाले आहे त्याचा दाखला देत मनिष सिसोदिया यांनी ही मागणी केली आहे.