मुंबई – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर गंभीर आरोप केले आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सुळे माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या, भाजपकडून तीन वेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. त्या पुढे म्हणाल्या, अजित पवार यांनी 2 जुलैला भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीतील या फुटीची जोरदार चर्चा झाली. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? त्याची कारणं काय? असे सवाल उपस्थित होत असतानाच सुळे यांनी हा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सभा घेण्यास सुरुवात केली आहे. येवला, बीड आणि आता कोल्हापुरात शरद पवारांची सभा होणार आहे. येत्या २५ तारखेला कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, या सभेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले,“शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही खासगीत विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.