वाई – परतीच्या पावसामुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार होते; परंतु नियोजित दौरा रद्द करून ते थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरला गेले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला. दरेकर यांच्या या कृतीमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भाजप नेत्यांचे दौरे सुरू आहेत. यात सातारा जिल्ह्याच्या दौऱ्याची जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्यावर टाकण्यात आली होती. वाई तालुक्याच्या पश्चिम भागासह इतर ठिकाणीही नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे घरे, जनावरे, सार्वजनिक मालमत्तेबरोबर सोयाबीन व भात या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या नुकसानीची पाहणी करायला येणाऱ्या दरेकर यांच्या दौऱ्याची तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आठवडाभर जोरदार तयारी केली होती. विरोधी पक्षाचा धडाकेबाज नेता येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागही कामाला लागला. वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या पश्चिम भागातील रस्त्यावर लाखो रुपये खर्ची पडले; परंतु दरेकर यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांकडे पाठ फिरवली.
थंड हवेच्या जाऊन विरोधी पक्षनेत्यांनी आपली एक प्रकारे चेष्टा केल्याची बळीराजाची भावना झाली आहे. वास्तविक विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यामुळे सत्ताधारी तात्काळ नुकसानभरपाई देतील, अशी भाबडी आशा होती; परंतु भाजप नेत्याच्या हुलकावणीमुळे ही आशा हवेत विरून गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पश्चिम भागातील हजारो हेक्टर भातशेती जमीनदोस्त झाली आहे.
बळीराजाची वर्षभराची आर्थिक पुंजी पाण्यात बुडून गेल्याचे कोणालाही सोयरसुतक नाही. फक्त पंचनामे सुरू आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीच्या भरपाईची गरज असताना, भाजप नेत्याच्या दौऱ्यासाठी रस्ते दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च उधळले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वाई तालुक्यातील चिखलात कमळ’ कसे रुजणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यास वावगे ठरणार नाही.
वाईच्या विश्रामगहात अधिकाऱ्यांशी चर्चा
प्रवीण दरेकर यांनी तालुक्याचा दौरा रद्द करून वाईतील विश्रामगृहावर शासकीय अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. त्यावेळी नुकसानग्रस्त भागातील एकही शेतकरी उपस्थित नव्हता. त्यामुळे तेथे नक्की काय चर्चा झाली, याची पुसटशीही कल्पना नसल्याने मदत कधी मिळणार, ही विवंचना बळीराजाला सतावत आहे.