मुंबई – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र हे “स्क्रिप्ट’चाच एक भाग आहे. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 45 हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होता. त्यामुळेच भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. पोटनिवडणुकीत पराभवाची चाहूल लागल्यामुळे भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केला.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. त्यावेळी मुंबई सत्र न्यायालय परिसरात माध्यमांसोबत चर्चा करत असताना संजय राऊतांनी वक्तव्य केले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतल्यामुळे मुरजी पटेलांचे कार्यकर्ते संतप्त https://t.co/3M4X5DnU5q
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2022
राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने आपला उमेदवार माघार घेतल्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेतल्याबद्दल आपले आभार. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
मनसेचा खोचक टोला
ही भूमिका घेण्याबद्दल उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे कौतुक केले आणि राज ठाकरेंची दखल घेतली नाही. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कोत्या मानाचे आहे. त्यामुळेच शरद पवारांना पुढे केले. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणूक लढवत होते. मात्र भाजपने त्यांच्या उमेदवार मागे घ्यावा अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. पण शिवसेनेला राज ठाकरे यांना याचे श्रेय द्यायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी शरद पवारांना पुढे केले, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक टोला लगाविला.