पारनेर – कोविड महामारी काळात सन 2019 नंतर ग्रामीण भागातील विस्कळीत झालेली एसटी बससेवा 15 जूनपासून सुमारे 3 वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच सुरू होणार आहे. ग्रामीण भागातील कोविड महामारीमुळे बंद असलेल्या बसेस पुन्हा ग्रामीण भागात मुक्काम सुरू करणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वारणवाडी, कोतुळ, जवळा, पिंपरी जलसेन, डोंगरवाडी, तिखोल, वासुंदे, कळस, सुरेगाव, वनकुटे, गुणोरे या बसगाड्या पूर्ववत मुक्कामी चालू होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाने 75 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सेवा देणारी अमृत महोत्सव योजना तसेच महिला प्रवाशांसाठी 50 टक्के सवलत देणारी महिला सन्मान योजना तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना शैक्षणिक सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी केले आहे.
सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये 15 जूनपासून विद्यार्थी पासेसची विक्री होणार आहे. यासाठी पारनेर आगारातील दोन वाहतूक नियंत्रक शाळांना भेट देऊन विद्यार्थी पास विक्री करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस स्थानकावर तासनतास उभे राहण्याची गरज भासणार नाही.