अन्याय निवारणासाठी अत्र्यांचे बंडाचे निशाण
पुणे, दि. 14 – आचार्य अत्रे हे मानवी मूल्यांवर निष्ठा ठेवणारे महान साहित्यिक होते, असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक डॉ. भालचंद्र फडके यांनी आचार्य अत्रे यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्ताने बोलताना काढले. सर्वसामान्य व्यक्तीच्या अन्याय निवारणार्थ अेमिल झोलाने जी ताकद उभी केली ती ताकद आपणाकडील साहित्यिकांमध्ये फक्त आचार्य अत्रे यांच्याकडे होती. सामान्य व्यक्तीवरील अन्याय निवारणासाठी आचार्य अत्रे यांनी बंडाचे निशाण उभे केले, असेही फडके यांनी म्हटले.
प्रत्येक भारतीय आपला बांधव आहे
पुणे – या देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा अथवा पंथाचा असो तो आपला बांधव आहे, हे कृतीने सिद्ध करावयास पाहिजे. स्त्री विषयीची प्रचलित समाज जीवनातील भावना बदलून त्यांना सर्व क्षेत्रात समानतेने वागविले पाहिजे, असे उद्गार यदुनाथ थत्ते यांनी काढले.
मानवी हक्कांसाठी झगडत राहू
वॉशिंग्टन – मानवी हक्कांसाठी आक्रमकपणे झगडण्याची मोहीम आम्ही चालूच ठेवू. मग रशियाने समजा त्यास आपल्या व्यवहारात लुडबूड असे म्हटले तरी म्हणो, असे मत अध्यक्ष कार्टर यांनी मांडले.