दुशांबे, (ताजिकीस्तान) – अफगाणिस्तानात स्थायी शांतता वाढवण्याच्या गरजेवर परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भर दिला आहे. ताजिकीस्तानमधील दुशांबे इथे नवव्या “हार्ट ऑफ एशिया’ मंत्रीस्तरिय परिषदेमध्ये ते बोलत होते. आशियातील देशांच्या हिताच्या दृष्टीने अफगाणिस्तानमध्ये स्थायी शांतता राहणे गरजेचे आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील स्थायी शांततेसाठी आशियातील प्रत्येक संबंधितांनी शांतता प्रक्रिया दुपटीने वाढवण्याची गरज आहे. या शांतता प्रक्रियेमध्ये अफगाणिस्तानमधील अंतर्गत आणि भोवतालच्या शांततेचाही समावेश आहे. यासाठी त्या देशातील आणि आसपासच्या सर्वांचे हित जुळवून आणणे आवश्यक आहे. जर शांतता प्रक्रिया यशस्वी व्हावी, असे वाटत असेल, तर तोडगा काढण्याच्या दृष्टीने वाटाघाटीत सहभागी होणाऱ्यांनी राजकीय विश्वासाचे गांभीर्याने वचन दिले पाहिजे, असे जयशंकर म्हणाले. सामूहिक यश हे साध्य करणे सोपे नसते. मात्र शिल्लक राहिलेला एकमेव पर्याय म्हणजे अपयश सामूहिकपणे स्वीकारणे हाच असतो, हे ही ध्यानात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
“हार्ट ऑफ एशिया’ परिषदेच्या उद्घाटनापूर्वी जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ घनी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ आणि तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेव्हलट कॅव्हुसोग्लू यांचीही भेट घेतली. तजिकीस्तनमध्ये भारताच्या “बॉर्डर रोड ऑर्गनायजेशन’च्यावतीने बांधण्यात येणाऱ्या 8 पदरी महामार्गाच्या कामाची पहाणीही जयशंकर यांनी केली.
“हार्ट ऑफ एशिया’ या प्रक्रियेची स्थापना 2 नोव्हेंबर 2011 रोजी तुर्कीची राजधानी इस्तंबूल येथे झाली. हे व्यासपीठ अफगाणिस्तान, त्याचे शेजारी आणि प्रादेशिक भागीदारांच्या सामुदायिक आव्हाने आणि हितसंबंधांवर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केले गेले. या गटामध्ये 15 देश, 17 सहकारी देश आणि 12 सहकारी प्रादेशिक् आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच समावेश आहे.