पुणे : महाराष्ट्रात इयत्ता अकरावी, बारावीला प्रवेश घेऊन विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे अभ्यासासाठी जात असल्याबाबतच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.
आयआयटी प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जॉंइट एंट्रन्स एक्झामिनेशन द्यावी लागते. पदव्युत्तर प्रवेशासाठी ग्रॅज्युएट ऍप्टिट्युड टेस्ट इन ही परीक्षा द्यावी लागते. या अभ्यासासाठी राज्यातील बहुसंख्य विद्यार्थी कोटा येथे जातात. दरम्यान, करोना प्रादुर्भामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात कोटा येथे अनेक विद्यार्थी अडकून पडले. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी पालकांनी शासनाकडे मागणी करत त्यासाठी पाठपुरावा केला होता. शासनाने अखेर एसटी बसद्वारे या विद्यार्थ्यांना आणण्यास सुरुवात केली आहे.
विज्ञान शाखेतील अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची कनिष्ठ महाविद्यालयांनी बायोमेट्रिक हजेरी घेण्यासाठी शासनाने पूर्वीच आदेश जारी केले आहेत. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की नाही याबाबत साशंकताच आहे.
“कोटा येथे गेलेले विद्यार्थी आधी परत येणे महत्त्वाचे आहे. या विद्यार्थ्यांची सविस्तर यादी करण्यात येणार आहे. ते कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेतात, याची माहिती मिळण्यात येणार आहे. विद्यार्थी कोटा येथे का व कोणाची परवानगी घेऊन गेले होते, याची चौकशी करण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांची खोटी हजेरी लावून त्यांना कोटा येथे अभ्यासासाठी पाठवत असल्याची माहिती ऐकायला मिळत आहे. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडे त्याबाबत लेखी तक्रारी आलेल्या नाहीत. मात्र, तरीही या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल मागवण्यात येणार आहे,’ असे शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.