पुणे – बाललैंगिक अत्याचार प्रकरणात मोठ्या प्रमाणात पीडित फितुरी होत आहे. “मुलगी अल्पवयीन नसून सज्ञान आहे’ “गैरसमजातून तक्रार दिली आहे’ “आरोपीचे नाव चुकीचे आहे’, “मानसिक धक्क्यात असल्यामुळे नेमके काय घडले आठवत नाही’, “तसे काही घडले नाही’ अशी एक ना अनेक कारणे देऊन पीडित बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित फितूर होत आहेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढत असताना, खटल्यांमध्ये फितुरीचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांमधून दिसून येते.
कोवळ्या वयात लहान मुलींना अत्याचार, लैंगिक शोषण, विनयभंग अशा घटनांना सामोरे जावे लागते. बहुतांश प्रकरणात नातेवाईक तसेच परिचयाचील व्यक्तींचा सहभाग असतो. त्यावर पालक पोलीस ठाण्यात जातात. मात्र, काही प्रकरणांमध्ये समाजात बदनामी होईल या भीतीने दडवली जातात. तर, काही प्रकरणे आरोग्य चाचणीत गर्भवती राहिल्यानंतर समोर येतात. न्यायालयात सरतपासणीत पीडितेकडून घटनेचा सर्व प्रकार कथन केला जातो. उलटतपासणीत मात्र पीडित तसेच कुटुंबीयांकडून “तसे काही घडलेच नाही’ याखेरीज विविध कागदपत्रे न्यायायात सादर करत मुलगी सज्ञान असल्याचे पुरावे देऊन फितूर होत आहेत,’ असे सरकारी वकिलांचे निरीक्षण आहे.
“अल्पवयीन मुलींवरील अत्याचारप्रकरणात पीडित, तिचे कुटुंबिय फितूर होण्याची शक्यता असते. 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्यात येईल, असे आरोपीकडून सांगण्यात येते. काही प्रकरणांत पीडितेचे इतरत्र लग्न झालेले असते. तिचा संसार तुटेल, या भीतीने पालक तिला न्यायालयात आणण्यास घाबरतात. या घटनांचा फायदा आरोपीला होतो.” – ऍड. राहुल भरेकर, फौजदारी वकील
पीडित फितुरीची कारणे…
- पीडितेबरोबरच लग्नाचे अमिष
- नातेवाईक असल्यास कुटुंबीयांचा दबाव, समाजात बदनामीची भीती
- आरोपीकडून कुटुंबीयांना पैशांचे आमिष
- भविष्यात काम, शिक्षणात येणाऱ्या अडचणी
- तिचे इतर मुलासोबत लग्न झालेले असणे