Aaditya Thackeray – दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काल स्मृतीदिन होता. यानिमित्त सायंकाळी एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरच राडा झाला. दोन्ही गटातील उपस्थित कार्यकर्त्यांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले,’ही एक दुर्दैवी घटना आहे, कारण जी गद्दार गँग आहे, जे घाबरले आहेत जे बाप चोरत पक्ष चोरणारे लोक आहेत, जे गुजरात आणि गुवाहाटीला पळून गेले त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही. आधी त्यांचा फोटो वापरुन, आमचा पक्ष वापरून, नाव वापरुन स्वतःसाठी राजकारण करण्याचा प्रयत्न केला.’
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,’लोकांचे प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. नवी मुंबई मेट्रो सुरु झालेली नाही. डिलायल रस्ता सुरु झालेला नाही, बिल्डर पालकमंत्र्यांकडे वेळ नसावा. जनतेकडे लक्ष द्यायचं नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर दंगली घडवायच्या, वातावरण बिघडवायचं, उद्योग गुजरातला धाडायचे हे वातावरण मिंधे सरकारच्या नावाखाली सुरु आहे.’ असं म्हणत शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.