Aditya Thackeray : दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे आणि मंत्री नारायण राणे यांनी याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार थेट आरोप केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी लवकरच आदित्य ठाकरे यांना अटक होणार असल्याचे म्हंटले होते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला रोजी मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दिशाने आत्महत्या केली होती. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता. दिशाच्या मृत्युनंतर जवळपास ६ दिवसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात आले.
दरम्यान, दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे ?
नारायण राणे म्हणाले की, “आता हे ठाकरे गट बैठक घेतात. थोड्या दिवसांनी आदित्य ठाकरे हे बैठकीला सुद्धा नसतील. सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. त्यांच्यासोबत संजय राऊत देखील असतील. यांच्याकडे असलेले 16 आमदारसुद्धा राहणार नाहीत.” त्यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आले होते.