नवी दिल्ली – कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी आणि छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या पीक पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारने 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना आणि प्रोत्साहन ही योजना सुरु केली आहे असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले.
क्वीपेम येथील बोरीमोल क्रीडा संकुलात कृषी महोत्सव 2022 चे उद्घाटन केल्यानंतर ते म्हणाले की, वर्ष 2027-28 पर्यंत अशा 10,000 संस्थांची स्थापना आणि प्रोत्साहन याकरिता 6,865 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. गोवा राज्यात ह्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ही योजना छोट्या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी 2000 रुपये असे वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये थेट जमा केले जातात. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन पद्धती युवावर्गाला राज्यांतील कृषीक्षेत्राकडे आकर्षित करत आहेत.
कृषी, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्यशेती आणि फुलशेती या सर्वांच्या समावेशातून एकात्मिक पद्धतीची शेती करण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी आणि संबंधित क्षेत्रांना सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. गोवा राज्य सरकारने सुरु केलेली स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना इतरांसाठी आदर्श आहे आणि यातून केवळ गोव्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आत्मनिर्भर होण्यासाठी मोठी मदत होणार आहे.