सातारा – वाढीव निधी मिळत नसल्याने कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे ना. अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात कास धरण प्रकल्पाच्या कामासाठी वाढीव 57.91 कोटी निधीची तरतूद केली. यामुळे कास धरणाची उंची वाढवण्याचे निधीअभावी थांबलेले काम आता लवकरच मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यातील सर्वच अडचणी दूर झाल्या आहेत. सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे सातारकरांच्यावतीने आभार मानले आहेत.
शहरासह 15 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले. त्याचवेळी पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला. वन विभाग, हरित लवाद यांसह अनेक विभागाच्या परवानग्याही त्यांच्या पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या.
त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सद्य परिस्थितीत हे काम 75 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, वाढीव निधीची तरतूद न झाल्याने पुढील काम रखडले होते. या प्रकल्पासाठी मान्यता मिळालेल्या वाढीव 57.91 कोटी रुपये निधीला वित्त विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. या निधीच्या तरतुदीसाठी नुकत्याच झालेल्या दोन दिवशीय अधिवेशनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांची भेट घेतली.
ना. पवार यांनी कास धरण प्रकल्पासाठीच्या वाढीव 57.91 कोटी निधीची तरतूद पाणीपुरवठा विभागातून केली. सातारा नगरपालिकेत सत्ता नसतानाही सातारकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी कायम झटणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास प्रकल्पासाठी निधी मिळवून हा प्रश्न कायमचा मार्गी लावल्याबद्दल सातारकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.
नवीन पुलासाठी 3.5 कोटीची तरतूद
कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे सातारा, कास ते बामणोली हा रस्ता बाधित होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर नवीन पुलासाठी निधी मंजूर करण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली होती. या पुलाच्या निधीलाही ना. पवार यांनी मंजुरी दिली आहे. या नवीन पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 3.5 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या कामालाही आता गती मिळणार आहे.