मुंबई – भारतीय मानक ब्यूरोने 2020-21 आणि 2021-22 या वर्षात 211 ठिकाणी शोधमोहीम आणि जप्तीची कारवाई केली आहे, त्यात 28 कारवाया इलेक्ट्रिक उत्पादनांशी संबंधित असून बीआयएस मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन केल्याशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी आज लोकसभेत दिली. या सर्व कारवायांची राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय यादी परिशिष्ट मध्ये जोडली आहे.
शोधमोहीम आणि जप्तीच्या यशस्वी कार्यवाहीनंतर, बीआयएस ने या प्रकरणातल्या कंपन्यांविरोधात खटले दाखल केले आहेत. जर एखाद्या कंपनीने या उल्लंघन प्रकरणी दंड भरण्याची तयारी दर्शवली, तर तो गुन्हा दंड आणि इतर कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे पाठवला जातो आणि त्यानुसार, बीआयएस कायद्यान्वये,नियमनानुसार कारवाई केली जाते किंवा दंड आकाराला जातो. 2021-22 या वर्षात, अशी 44 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली असून, दोन प्रकरणे दंड आकारून निकाली काढण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात आली आहेत.
बीआयएस ने प्रमाणित केलेल्या उत्पादनांचा दर्जा, गुणवत्ता प्रमाणित दर्जानुसार नल्याची तक्रार मिळाल्यानंतर बीआयएस त्यावर कारवाई करते. तक्रारदाराने उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत केलेल्या तक्रारीनुसार, त्याचा तपास केला जातो. तक्रारदार आणि परवानाधारक विक्रेता या दोघांचाही तपास केला जातो. शिवाय, तक्रार करण्यात आलेल्या उत्पादनांच्या दर्जाचा तपास स्वतंत्रपणे केला जातो.
त्यानंतर उत्पादन वाईट दर्जाचे आढळले, तर विक्रेत्याचा परवाना रद्द करणे किंवा स्थगित करणे अशी कारवाई केली जाते. किंवा, या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पर्यायी/सुधारित उत्पादने बाजारात आणण्याचा सल्लाही परवानाधारकांना दिला जातो.
बीआयएस मानक चिन्हांचा अनाधिकृत वापर करण्याविषयी तसेच गुणवत्ता नियंत्रण आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, बीआयएस ने शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे. अशा शोध आणि जप्तीच्या कारवाईत दर्जाच्या निकषांचे उल्लंघन केलेली उत्पादने जप्त केली जातात. आणि बीआयएस कायदा 2016 अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो.