पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात सतत होणाऱ्या वाहन तोडफोडीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. मागील तीन वर्षांत घडलेल्या घटनांचा अभ्यास करुन उपाययोजना सूचवल्या गेल्या आहेत. यामध्ये गुन्हे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकाऱ्यांना “कोपरा सभा’ घेण्यास सांगण्यात आले आहे. याद्वारे वाहने फोडणाऱ्या संशयितांची माहिती काढली जाणार आहे. गरज पडल्यास त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी बैठक बोलवली होती. यामध्ये अपर पोलीस आयुक्त(गुन्हे) शैलेश बलकवडे यांनी वाहन तोडफोडीसंदर्भात सादरीकरण केले. हे प्रकार रोखण्यासाठी एक अॅक्शन प्लॅनही तयार करण्यात आला. याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांना करण्यात आल्या.
बलकवडे म्हणाले, शहरात २०२१ ते २०२३ दरम्यान १२२ वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या. ज्या भागांत सातत्याने घटना घडल्या, तेथे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. या आरोपींचा अभ्यासही केला आहे. यामध्ये सराईतांपेक्षा अल्पवयीन मुले आणि भाईगिरीचे आकर्षण असलेल्या तरुणांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसले. या घटना रात्री आठ ते दोन दरम्यान घडलेल्या आहेत. यातील बहुतांश घटना नशेमध्ये, तसेच किरकोळ खंडणीसाठी केल्या गेल्या आहेत.
…असा आहे अॅक्शन प्लॅन
चायनीज, भेळ, बिर्याणीच्या गाडीवाल्याने फुकट खायला दिले नाही, पैसे मागितले म्हणून अनकेदा तोडफोडीचे प्रकार घडले आहेत. अशा व्यावसायिकांकडून १००-२०० रुपये मागन ते न दिल्यानेही तोडफोड झाल्याचे समोर आले आहे. अनेकदा किरकोळ नशेबाज वाहनांवर कोयते, रॉड आणि दगड फेकून तोडफोड करतात. यामुळे स्थानिक पोलिसांना वस्ती परिसरात कोपरा सभेद्वारे छोट्या व्यावसायिकांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे.
त्यांना हप्त्यासाठी कोणी त्रास देत आहे का, फुकट खाऊन पैसे दिले जात नाहीत का? अशा व्यक्तींची माहिती त्यांच्याकडून मिळवण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे बेकायदा मद्य, गांजा, नशिले पदार्थ विक्रेत्यांवर आणि त्याचे सेवन करणाऱ्या तरुणांचा माग काढण्यास सांगितले गेले आहे. घटनेच्या वेळा लक्षात घेता अचानक नाकाबंदी करुन झाडाझडती घेतली जाणार आहे.
सीसीटीव्ही निकामी, दुरुस्ती कोणी करायची?
पोलीस सीसीटीव्हीव्दारे माग काढतात, हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ठाऊक आहे. यामुळे अनेकदा या व्यक्ती सीसीटीव्ही निकामी करतात. तर अनेक गल्ली-मोहल्यातील सीसीटीव्ही निकामी झाले आहेत, त्यांची दुरुस्ती झाली नाही. हे सीसीटीव्ही महापालिकेने बसवले असून] त्याचे नियंत्रण मात्र पोलिसांकडे आहे. यामुळे ते निकामी झाल्यास दुरुस्ती कोणी करायची यावरुन दोन्ही विभागांत चालढकल होताना दिसते. नेमकी हीच बाब गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहे.
गुन्हे शाखेत टायर आले
शहरातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडविणाऱ्या घटकांना सोडू नका. कायदा मोडणारा कितीही मोठ्या घरचा असला, तरी त्याला सुधारण्यासाठी टायरमध्ये टाकून हाणा, कायद्यासमोर कोणीही मोठा नाही, असे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर भाषणात सांगितले होते. याची दखल गुन्हेशाखेने घेतली असून, त्यांनी खरोखरच टायर आणून ठेवले आहेत.
मात्र, काही ठिकाणी टायर लावण्यास जागा नसल्याने ते अद्याप लावले गेले नाहीत. मात्र, आगामी काही दिवसांत टायरमध्ये टाकून गुन्हेगारांना पोलीस “तपास’ करत असल्याचे फिल्मी चित्र पाहयला मिळणार आहे. गिरणीचा पट्टा तर अगोदरपासून पोलिसांकडे आहे.