यवत – यवत (ता. दौड) येथे थकीत वीजबिलपोटी महावितरण कंपनीने घरगुती वीजजोड तोडण्याची कारवाई सुरु केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या थकीत वीजबिलमुळे महावितरण कंपनीने कृषीपंपाच्या वीजतोडीची मोहीम राबवली होती. यावरून महावितरण आणि शेतकरी यांचा मोठा संघर्षवाद पेटलेला पाहायला मिळाला होता. अधिवेशनात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घोषणेनंतर कृषीपंपाच्या वीजतोडीची कारवाई स्थगित होऊन 31 मार्चपर्यंत कृषीपंपाच्या वीजबिल थकबाकी भरण्याची मुदत तीन महिने पुढे ढकलली.
त्यामुळे तरी तात्पुरत्या स्वरूपात का होईना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु या दिलासानंतर महावितरणने आपला मोर्चा घरगुती वीज ग्राहकांकडे वळविला आहे. काही दिवसापासून महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरगुती ग्राहकांच्या वीजजोड तोडून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाकाच लावला आहे.
याबाबत यवत महावितरण कार्यालयचे अभियंता काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ज्यांच्या वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यांनी थोडेफार बाकी भरून आपला वीजपुरवठा सुरळीत करून घ्यावा व थकीत वीजबिल ग्राहकांनी बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.